अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात म्हणजे SNCUमध्ये अचानक आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आग लागल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत इतर बालकांना कक्षाबाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान नवजात शिशू अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक बिघाड होऊन स्फोट झाला. त्यानंतर कक्षात आग लागली आणि काही वेळातच धूर मोठ्या प्रमाणात पसरला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं.
काही बालकांवर सुपर स्पेशालिटीत उपचार
आग लागलेल्या कक्षात त्यावेळी १२ नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आग आणि धूर लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. मात्र, या प्रयत्नांदरम्यान तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आगीतून वाचवण्यात आलेल्या काही बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चार बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या हाताला आणि पायाला भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य काही बालकांना किरकोळ भाजल्याची माहिती आहे. काही बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.
३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाणार
या दुर्घटनेत तीन नवजातांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या घटनेवर आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितली.
अमरावतीमधील घटनेची माहिती घेतल्यानंतर मंत्री आबिटकर म्हणाले, ‘ अमरावतीमध्ये स्फोट झाला की शॉर्ट सर्किट झाला, हे स्पष्ट व्हायचं आहे. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून जीव वाचवला. दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला. या बालकांना वाचवता आले नाही. दुर्घटनेनंतर इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही खासगीमध्ये आहेत. तर सरकारीमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते आता सुरक्षित आहेत. दुर्दैवाने तिघांना वाचवता आलं नाही, असेही त्यांनी सांगितले.
अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, नवीन इमारतीतील हा नवजात शिशू अतिदक्षता विभाग काही काळापूर्वीच सुरू करण्यात आला होता. कमी वजनाचे, कमी दिवसांचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर या विभागात उपचार केले जातात. त्यामुळे अशा संवेदनशील विभागात आग लागल्यानंतर अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम होती, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.








