छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयफोन 15 न दिल्यानं एका मुलाने चक्क स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. फक्त या घटनेत फक्त त्या मुलाचाच नाही तर त्याच्या आई -वडिलांनी देखील जीव गेला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
आयफोन 15 खरेदी करायचा हट्ट जीवावर बेतला
मुलगा कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष, वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 वर्ष आणि आई संगीता चांदगुडे अशी या घटनेतील मृतांची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही कारणामुळे मुलगा कुणाल चांदगुडे यांचा आपल्या आई-वडिलांसोबत वाद झाला होता. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे कुणाला याला आयफोन 15 खरेदी करायचा होता, त्यासाठी तो हट्टाला पेटला होता. यावरूनच त्याचा त्याच्या आई -वडिलांसोबत वाद झाला. या वादानंतर मनात राग असल्याने तो आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याच्या पाठोपाठ त्याचे आई-वडील देखील डोंगरावर पोहोचले, परंतु कुणाला हा कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.
आई-वडिलांनी या डोंगरावर तब्बल तीन तास त्याची समजूत काढली
त्याच्या आई-वडिलांनी या डोंगरावर तब्बल तीन तास त्याची समजूत काढली, तो डोंगराच्या अत्यंत उंच असलेल्या भागावर उभा होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. आई-वडील आणि स्थानिक लोकांकडून तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली, मात्र तो काही डोंगरावरून खाली उतरण्यास तयार नव्हता.
एका आयफोनमुळे अख्खं घरं संपलं
शेवटी वडिलांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये दोघही डोंगरावरून खाली कोसळल्याचं म्हटलं जातं. तर काहींच्या माहितीनुसार त्या वादात मुलांसोबत त्या दोघांनीही उडी मारली. पण एका आयफोनमुळे अख्खं घरं संपलं ही गोष्ट मात्र तेवढीच धक्कादायक आणि हादरवणारी आहे. या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
डोंगर अवैध उत्खननामुळे बनला मृत्यूचा सापळा
मात्र, या भीषण घटनेमुळे तिसगाव परिसरातील मुख्य धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या खवड्या डोंगराचे एक अत्यंत भयानक वास्तव समोर आले आहे. हा डोंगर आता केवळ नैसर्गिक डोंगर राहिलेला नसून वारेमाप अवैध उत्खननामुळे तो थेट मृत्यूचा सापळा म्हणजेच ‘सुसाइड पॉइंट’ बनला आहे. डोंगराची पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि निसर्गाच्या ऱ्हासाचे वास्तव समोर आले आहे.
कारण एका बाजूला डोंगर पोखरून पर्यावरणाचा विनाश केला जात आहे. दुसरीकडे तोच पोखरलेला डोंगर आता माणसांचे बळी घेत आहे. चांदगुडे कुटुंबाची घटना हे प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. या कड्याच्या परिसरात तातडीने मजबूत कुंपण उभारावे, सुरक्षा रक्षकांची नेमणू करावी, अन्यथा खवड्या डोंगर भविष्यात असेच अनेकांचे बळी जात राहतील.








