मुंबई उपनगर जिल्ह्यातील पश्चिम उपनगरांमध्ये पार पडलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजे SIR प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिम उपनगरातील १५ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण ४५ लाख ७२ हजार ३७८ नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल १५ लाख ६८ हजार मतदारांची पडताळणी होऊ शकलेली नाही. केवळ ३० लाख ३७ हजार ५०७ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून, उर्वरित मतदार बेपत्ता, निधन झालेले किंवा स्थलांतरित झाल्यामुळे ‘अन-कलेक्टेबल’ यादीत गेले आहेत. या निष्पन्नतेमुळे तब्बल सात मतदारसंघांतील लाखो मतदार मतदारयादीतून बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वर्सोवात ३८.५१, वांद्रे पश्चिम ३७.९९,मतदार पडताळणीबाहेर
मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर आहेत. त्यानंतर वर्सोवा ३८.५१, वांद्रे पश्चिम ३७.९९, गोरेगाव ३६.४७, अंधेरी पश्चिम ३६.४६, दिंडोशी ३५.४७, वांद्रे पूर्व ३४.४७, कांदिवली पूर्व ३३.६९, चारकोप ३२.९१, विलेपार्ले ३१.६३, अंधेरी पूर्व ३१.३५, जोगेश्वरी पूर्व ३०.०८, मागाठाणे ३०.४७ व दहिसरमध्ये २९.३८ टक्के मतदारांचा नोंदणी प्रक्रियेदरम्यान संपर्क झाला नाही. दुसरीकडे बोरीवलीमध्ये सर्वात कमी म्हणजे २५.६२ टक्के मतदार सापडले नाहीत. त्यामुळे हे मतदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
वर्सोव्यात मताधिक्याच्या ७१ पट मतदार बाहेर
वर्सोवा मतदारसंघात एक लाख १४ हजार मतदार पडताळणीबाहेर आहेत. विजयी उमेदवाराला अवघे १,६०० मताधिक्य मिळाले होते. त्या तुलनेत पडताळणी बाहेरील मतदारांची संख्या त्यांच्या विजयाच्या मताधिक्याच्या ७१.२५ पट आहे.
जोगेश्वरी पूर्वमध्ये १,५४१ मतांच्या मताधिक्याच्या तुलनेत ९१ हजार ४३७ मतदार पडताळणीबाहेर आहेत. हे प्रमाण ५९.३६ पट आहे.
मालाड पश्चिममध्ये हे प्रमाण २२.७६ पट, दिंडोशीत १८.२४ पट, वांद्रे पूर्वमध्ये ७.६९ पट, अंधेरी पश्चिममध्ये ५.४२ पट आणि वांद्रे पश्चिममध्ये ५.५६ पट आहे. याउलट बोरीवलीत पडताळणीबाहेरील मतदारांची संख्या विजयी उमेदवाराच्या मताधिक्याच्या ०.८५ पट इतकी आहे.
तिप्पट मतदार गेले कुठे?
पश्चिम उपनगरातील १५ मतदारसंघांतील विजयी उमेदवारांच्या मताधिक्यांची एकत्रित बेरीज पाच लाख ४७ हजार ९६३ आहे.
पडताळणी न झालेल्या मतदारांची संख्या तब्बल १५ लाख ३४ हजार ८७१ आहे. म्हणजेच पडताळणीबाहेरील मतदारांची संख्या एकत्रित मताधिक्याच्या सुमारे तिप्पट असल्याचे आढळून आले आहे.
लाखभर मतदार अद्याप पडताळणीबाहेर
मालाड पश्चिमेतील १,४१,६६७, गोरेगावमधील १,२२,९६४, दिंडोशी येथील १,१२,८०८, वर्सोव्यातील १,१४,०००, वांद्रे पश्चिमेतील १,१०,७८१, चारकोपचे १,०६,९५०, अंधेरी पश्चिम येथील १,०६,१७२ मतदार पडताळणीबाहेर आहेत.
मालाड पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक मतदार पडताळणीबाहेर राहिल्याचे स्पष्ट झालं आहे. तर बोरीवलीत हे प्रमाण सर्वात कमी आहे.








