गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव, मोजक्याच गाड्या आणि विशेषतः तळ कोकणाकडे होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष याविरोधात आता कोकणी प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जातात. मात्र,दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमान्यांना रेल्वे तिकिटांच्या अतोनात तुटवड्याला आणि प्रवासातील हालांना सामोरे जावे लागत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव, मोजक्याच गाड्या आणि तळ कोकणाकडे होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष याविरोधात आता कोकणी प्रवासी संघटना प्रचंड आक्रमक झाली आहे.
तब्बल २७२ ‘गणपती स्पेशल’ गाड्या जाहीर करूनही चाकरमान्यांना तिकिटे मिळालेली नाहीत
नियमित गाड्यांसह तब्बल २७२ ‘गणपती स्पेशल’ गाड्या जाहीर करूनही चाकरमान्यांना तिकिटे मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे, अनेक गाड्या केवळ रत्नागिरीपर्यंतच मर्यादित असल्याने सिंधुदुर्ग आणि तळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. ज्या महाराष्ट्राने या प्रकल्पात २२% गुंतवणूक केली, त्या महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या तीनच गाड्या आल्याची तीव्र खंत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावंतवाडी टर्मिनस, वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर, दादर-चिपळूण मेमू सेवा आणि कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण यांसारख्या प्रमुख मागण्या अद्याप धूळ खात पडून आहेत.
कोकण रेल्वे मुख्यालयावर ‘लाक्षणिक उपोषण’
या सर्व अनास्थेविरोधात आणि चाकरमान्यांच्या हक्कासाठी शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता, बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर ‘लाक्षणिक उपोषण’ छेडण्यात येणार आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर बागवे आणि सचिव यशवंत जड्यार यांनी सर्व मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील कोकणवासीयांना या उपोषणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.








