पुणेकरांसाठी किंवा पुण्याला प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यात आज मंगळवार, 18 ऑगस्टपासून 31 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली जात आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जमावबंदी लागू केल्याचे पोलिसांनी सांगितल आहे.
पुणे पोलिसांनी मोठा निर्णय, कारण काय?
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील 14 दिवसांसाठी संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी असणार आहे. पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 37(1), (3) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरात 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास, मोर्चे, रॅली, आंदोलने अथवा मिरवणुका काढण्यास पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक असणार आहे. विनापरवानगी गर्दी केल्यास किंवा या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कलम 135 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.
आदेशातील प्रमुख नियम व निर्बंध काय असणार आहे ?
शस्त्रे व ज्वलनशील पदार्थांवर बंदी: सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, स्फोटक अथवा ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास सक्त मनाई आहे.
आक्षेपार्ह कृतींवर बंदी: पुतळे जाळणे, चिथावणीखोर घोषणाबाजी करणे किंवा सामाजिक शांतता बिघडवणारे कृत्य करण्यावर पूर्णपणे बंदी असेल.
सोशल मीडियावर लक्ष: भडकाऊ भाषणे, अफवा पसरावेणारे संदेश किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.
अपवाद: कर्तव्यावर असणारे पोलीस, शासकीय कर्मचारी आणि 3.5 फुटांपर्यंतची काठी बाळगणारे सुरक्षारक्षक यांना यातून सूट देण्यात आली आहे.
आगामी काळात येणारी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि ईद-ए-मिलाद यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखणे आवश्यक आहे. यावेळी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद आणि उपोषण यांसारखी आंदोलने आयोजित केली जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
राहुल गांधींना कार्यक्रमासाठी परवानगी मिळणार का?
दरम्यान, राहुल गांधी यांचा छात्रो की गुंज हा कार्यक्रम 22 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे . मात्र, त्यापूर्वीच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांकडून परवानगी मिळणार की नाही? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.








