महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम स्वतः न्यायालयात हजर झाले होते. मात्र, आरोपीचे वकील अॅड.राहुल कासलीवाल न्यायालयात वेळेवर उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून, आता पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.
कोर्टात काय घडले?
आज दुपारी 12:30 च्या सुमारास विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम आणि अॅड. अजय मिसर न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर आरोपीच्या वकिलांचा पुकारा करण्यात आला. मात्र, आरोपीचे वकील राहुल कासलीवाल न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे.
अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकारची ठाम भूमिका स्पष्ट केली. उज्ज्वल निकम म्हणाले की, “भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या एसआयटी विभागाने लैंगिक अत्याचाराचे आठ वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. या आठपैकी अद्याप फक्त सहा गुन्हे सेशन कोर्टाकडे वर्ग करण्यात आले आहेत. दोन अजूनही मॅजिस्ट्रेट कोर्टात आहेत, लवकरच ते सेशन कोर्टात येतील अशी आशा आहे. सेशन कोर्टातील सहा खटल्यांपैकी एका खटल्यात मला जामीन द्यावा, कारण माझा गुन्हा हा जामीनपात्र आहे अशा प्रकारची विनंती अशोक खरातने न्यायालयाला केलेली आहे.”
अर्जाची सुनावणी न्यायालयाने 16 सप्टेंबर रोजी निश्चित
“त्यावर सरकारतर्फे आम्ही त्याला जामीन देऊ नये, अशी न्यायालयात विनंती केलेली आहे. त्याला जी कारणे आहेत, ती देखील आम्ही आमच्या खुलास्यात नमूद केलेली आहेत. अशोक खरात हा विविध पीडित स्त्रियांवर कशाप्रकारे लैंगिक अत्याचार करत होता आणि त्यांच्या मनात कशाप्रकारे भीतीचा बागलबुवा निर्माण करत होता, याबाबतचा सविस्तर पुरावा न्यायालयात आमच्या खुलास्यामार्फत दाखल करण्यात आलेला आहे. या अर्जाची सुनावणी न्यायालयाने 16 सप्टेंबर रोजी निश्चित केलेली आहे. त्यावेळी त्याच्या जामीन अर्जाच्या सुनावणीवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होणार आहे, यानंतर न्यायालय यासंदर्भात निर्णय देईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अशोक खरातवर तब्बल 17 गुन्हे
दरम्यान, अशोक खरात याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून तब्बल 17 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील 12 महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे आहे. 16 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








