समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ भीषण अपघात घडला आहे.छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा चक्काचूर
हा अपघात बसच्या भरधाव वेगामुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. वैजापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे सातत्याने अपघात होत असून, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहनांचा वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अपघातात एकाच मृत्यू तर दहाजण जखमी
या दुर्घटनेत हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला. तर बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अपघातानंतर समृद्धी महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुर्घटनाग्रस्त वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. हा अपघात बसच्या भरधाव वेगामुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र तरीही अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन अन् वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे पुन्हा एकदा भरधाव वेग, चालकांचे नियंत्रण आणि महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.








