गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु असून २१ जुलै ते २६ जुलैपर्यंत पावसाचा जोर जास्तच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या गुजरात किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर भागात आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्याची पावसाची परिस्थिती
सध्याची पावसाची परिस्थिती पाहता मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. संपूर्ण विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.दरम्यान पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कसा पाऊस राहणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ते २५ जुलै दरम्यान नैऋत्य मोसमी वारे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर कायम राहणार आहेत.त्यामुळे कोकण, गोवा,मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार त्याला ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात ही पावसाचा जोर वाढणार असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत
राज्यात पुढील पाच दिवस कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
२१ जुलै रोजी मुंबई, पालघर, ठाणे,रायगड, पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
पालघर,नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ,वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
मुंबईला कोणता अलर्ट जारी?
२२ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी रायगड ठाणे, पालघर जिल्ह्यांसह नाशिक, सातारा,कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२३ जुलै रोजी तळ कोकणासह संपूर्ण कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आले आहेत.तर, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, जळगाव,अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे.
२४ जुलै रोजी ठाणे रायगड रत्नागिरी पुणे व सातारा घाटमाथा व गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर, २५ जुलै रोजी रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रभरातील पावसाचा जोर कमी होणार असल्याचं बोललं जात आहे.
कोकणात पावसाचा जोर वाढणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील किनारी भाग आणि लगतच्या घाट परिसरात पुढील २ ते ३ दिवस वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर कायम राहील. पुढील 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट क्षेत्रात काही ठिकाणी विजांचा कडकडाटसह , सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात हलका ते मध्यम, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस हजेरीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.








