विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासनाचा निर्णय; शाळा सकाळी 8 ते 12.30

लातूर : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार, लातूर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची वेळ तात्पुरती बदलण्यात आली आहे.

नवीन आदेशानुसार, 23 जून 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा सकाळी 8.00 ते दुपारी 12.30 या वेळेत चालविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच सर्व खासगी व अनुदानित शैक्षणिक संस्थांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने लातूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर उष्णताजन्य आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी शाळांचे सकाळच्या सत्रात नियोजन करण्यात आले असून पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनांनी या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.