जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेपासून ते काम करण्यास दिरंगाई करण्यापर्यंत अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत.पण जेव्हा प्रशासनाचा दणका बसतो तेव्हा अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. लातूर येथील जिल्हा परिषदेत कर्मचारी नियमितपणे वेळेवर उपस्थित राहत असल्याचे दाखवत ऑनलाईन हजेरी लावून थेट गायब होत असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे पदाधिकारी व प्रशासनाने बुधवारी सकाळी १०.१५ वाजता खरी परिस्थिती पाहण्यासाठी थेट धाड टाकली. या अचानकच्या तपासणीदरम्यान, २० टक्के कर्मचारी आपल्या कार्यालयात उशिरा आल्याचे उघडकीस आले आहे. त्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे.
अचानक तपासणीमुळे कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा समोर
जिल्हा परिषदेच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वा. पर्यंत आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे म्हणून ‘आधार बेस अटेंडन्स सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. मात्र, काही कर्मचारी सकाळी ऑनलाईन हजेरी नोंदवतात अन् गायब होतात. ते आपल्या कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आलं. बुधवारी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी संयुक्तपणे प्रत्येक विभागांस अचानक भेटी देऊन पाहणी केली. यावेळी शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, पंचायत, अर्थ, आरोग्य, समाजकल्याण, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागांची पाहणी केली.
कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु
ऑनलाईन हजेरी लावून कामावर कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु असल्याचे समजतंय.या तपासणीत कर्मचाऱ्यांच्या हजेरीबरोबर कार्यालयीन स्वच्छतेचीही पाहणी करण्यात आली.
तपासणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
प्रशासनाच्या या अचानक केलेल्या तपासणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वेळेवर आपल्या कार्यालयात उपस्थित नसलेल्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले.
तीन दिवसांची मुदत दिली जाणार
जिल्हा परिषदेतील जवळपास २० टक्के कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना आता नोटिसा बजावण्यात येणार आहेत. खुलासा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.








