राज्यातील अनेक गावात आजही स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांनी नेहमीच फरफट होते. म्हणजे माणूस गेल्याचं दु:खापेक्षा मरणानंतरही त्याला कष्ट पडावे या विचारानेच ग्रामस्थांचा संताप होतो. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी किंवा शेड नसल्यामुळे मृतदेह उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ठेवावे लागतात.
असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मदनापूर येथे. मदनापूरमधील ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत परिसरातच मृतदेहावर अंत्यसंस्कार गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच वडिलांवर अंत्यसंस्कार
गावात स्मशानभूमीची सुविधा नसल्याने 81 वर्षीय वृद्धावर चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे प्रशासन आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.मदनापूर येथील रामदास पुरुषोत्तम मानकर यांचे निधन झाले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी अधिकृत स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांपुढे मोठा प्रश्न होता. अखेर त्यांचा मुलगा विजय मानकर यांनी संतप्त होत वडिलांवर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे आवारच अंत्यसंस्कार करण्यात आले.
30 गावांमध्ये आजही स्मशानभूमीची सुविधा नाही
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,मदनापूरसह परिसरातील सुमारे 30 गावांमध्ये आजही स्मशानभूमीची सुविधा नाही. अनेक वर्षांपासून निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलने करूनही शासन आणि प्रशासनाकडून कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे गावात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे याचाही विचार ग्रामस्थांना करावा लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्देव ते काय असू शकतं.
आता तरी संबंधित प्रशासन जागे होणार का?
एवढंच नाही तर शिवसेना आमदार संजय दरेकर नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून शासनाकडे स्मशानभूमीसाठी जागा व निधीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.मात्र आता या घटनेनंतर तरी राज्य सरकार आणि संबंधित प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.








