भिवंडीच्या गंगारामवाडी भागातील कोहिनूर अपार्टमेंटच्या ‘ए’ विंगमध्ये नूतनीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. या अपघातात दहा जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, तीन जण जखमी झाले आहेत.
इमारतीच्या दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू होतं
भिवंडीतील भीषण इमारत दुर्घटनेत १० रहिवाशांना जीव गमवावा लागला असला, तरी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. इमारतीला तडे जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन रहिवाशांना तातडीने बाहेर काढले. घोगरे इमारतीबाहेर पडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत इमारत कोसळली. इमारतीच्या दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणी महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर इमारत मालक आणि दुरुस्ती कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई
ही इमारत आता उद्या, सोमवारी ३ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्णत: पाडण्यात येणार आहे. या घटनेनंतर, इमारतीचे मालक बिलाल अहमद अबूबकर खान आणि कंत्राटदार अशोक पासवान यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या अपघातात कंत्राटदार अशोक पासवान यांचाही मृत्यू झाला. असे असूनही, पोलिसांनी तपासाअंती मृत कंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. अपघात झाल्यापासून पोलीस आणि प्रशासन सातत्याने कारवाई करत आहेत.
पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान, पोलिसांनी इमारतीमधील रहिवासी असलेल्या अमृतलाल निषादला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, अमृतलाल निषादने इतर रहिवाशांकडून दुरुस्तीसाठी पैसे गोळा केले आणि त्यांच्यामार्फत कंत्राटदार अशोक पासवानला कामाचे कंत्राट दिले. पोलीस त्याची चौकशी करत असून, तपासानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून, भिवंडी महानगरपालिकेने कोहिनूर अपार्टमेंट्सचा ‘ए’ विंग आणि ‘बी’ विंग पूर्णपणे रिकामा केला आहे. ‘ए’ विंगमध्ये ३८ आणि ‘बी’ विंगमध्ये ६०, असे एकूण ९८ फ्लॅट्स होते. सर्व कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, रहिवाशांनी इमारतीमधून आपले सामानही हलवले आहे.
अपघातात १० जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील भिवंडी येथे कोसळलेल्या चार मजली इमारतीच्या दुरुस्तीसाठी जबाबदार असलेल्या मालक आणि कंत्राटदाराविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्घटनेत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नगरपालिकेने आधीच असुरक्षित घोषित केलेल्या इमारतीच्या बांधकाम आणि देखभालीसाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.








