सर्वजण ज्या सणाची आतुरतेनं वाट पाहतायत तो म्हणजे गणेशोत्सव.सर्वजण आपापल्या घरी बाप्पााच्या आगमनासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.एवढंच नाही तर, गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. कारण गणेशोत्सवाला लाखो चाकरमानी आपापल्या गावी जात असतात. विशेषत: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते.
त्यामुळे यंदाच्या सणात कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि नोकरदारांची होणारी तुफान गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पुणे ते रत्नागिरी दरम्यान 10 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचे अधिकृत आरक्षण 1 ऑगस्ट 2026 पासून प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना ऐनवेळी होणाऱ्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे.
वातानुकूलित आणि विशेष फेऱ्या
कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी होणारी ओढाताण थांबवण्यासाठी या विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या या 10 फेऱ्यांमध्ये ‘पुणे-रत्नागिरी एसी वीकली स्पेशल’ आणि ‘पुणे-रत्नागिरी वीकली स्पेशल’ अशा दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील ट्रेन्सचा समावेश असेल. गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत या गाड्या धावणार आहेत.
गणपती उत्सवात कोकण प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेने पुणे-रत्नागिरी दरम्यान विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये आरामदायी प्रवासासाठी AC वीकली स्पेशल आणि सामान्य प्रवाशांसाठी साध्या डब्यांची स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार असून, यामुळे सणासुदीत कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल.
प्रवासाची वेळ आणि प्रमुख स्थानके
पुण्यातील आयटी व्यावसायिक आणि चाकरमान्यांना वीकेंडला गावी जाता यावे, यासाठी या गाड्यांच्या वेळा अत्यंत सोयीस्कर ठेवण्यात आल्या आहेत.
पुण्याहून सुटण्याची वेळ : ही विशेष ट्रेन मध्यरात्री 12:25 वाजता पुण्याहून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीत दाखल होईल.
रत्नागिरीहून परतण्याची वेळ : परतीच्या प्रवासात ही गाडी संध्याकाळी 05:50वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05:20 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.
कुठे थांबणार? : प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, चिपळूण आणि संगमेश्वर रोड या प्रमुख स्थानकांवर थांबेल.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक
यंदा संपूर्ण महाराष्ट्रात 246 गणपती स्पेशल ट्रेन्स चालवल्या जात आहेत. यामध्ये मुंबई म्हणजे CSMT आणि LTT येथून 174 फेऱ्या, पुण्यातून 10 फेऱ्या आणि दिवा स्थानकावरून सुटणाऱ्या 62अनारक्षित मेमू गाड्यांचा समावेश आहे.
खाजगी बस चालकांकडून सणासुदीच्या काळात होणारी भाडेवाढ आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता, रेल्वेने केलेला हा पर्याय सर्वसामान्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरेल.
तिकीट बुकींग कधीपासून सुरु?
या विशेष गाड्यांचे बुकिंग 1 ऑगस्टपासून IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, ऐनवेळची गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी आपले आरक्षण वेळेत पूर्ण करून घ्यावे. या सुविधेमुळे यंदा पुण्यातील लाखो गणेशभक्तांचा कोकणातील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुटसुटीत होईल.








