आजच्या काळात वाढदिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार किंवा अनावश्यक खर्चात साजरा करण्याची प्रथा असताना, ‘निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांनी मात्र पुन्हा एकदा समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. संस्थेच्या महाराष्ट्र राज्य खजिनदार अलका सुनील चोरघे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक ३० जुलै २०२६ रोजी वसई परिसरातील ६० गरजू विद्यार्थ्यांना भोजनाची ताटे, शालेय उपयोगी वस्तू आणि खाऊचे वाटप करून अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची आणि अभ्यासाची ज्योत
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय आणि शैक्षणिक वातावरणात झाली. या प्रसंगी जुलै महिन्यातील थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनचरित्रावर व त्यांच्या देशभक्तीवर प्रकाश टाकण्यात आला. संस्थेच्या प्रसारमाध्यम समितीच्या सदस्य कीर्ती भट्ट आणि दयानंद सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या विचारांची, त्यांच्या ध्येयनिष्ठेची आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या सिंहगर्जनेची सोप्या भाषेत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची आणि अभ्यासाची ज्योत प्रज्वलित केली.
चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानावर स्पर्धा
त्यानंतर वसई तालुका सचिव सौ. रूपाली मोलावडे यांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला आणि सामान्य ज्ञानाला चालना देण्यासाठी एक प्रश्नोत्तरांची स्पर्धा घेतली. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी अत्यंत अचूक उत्तरे दिली. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने विशेष बक्षीसही देण्यात आलं.
‘आदर्श विद्यार्थी’ निवड आणि प्रोत्साहन
विद्यार्थ्यांमधील गुणांना वाव देण्यासाठी दोन्ही शाळांमधून प्रत्येकी ‘आदर्श विद्यार्थी- विद्यार्थीनी’ यांची निवड करण्यात आली. निवडून आलेल्या आदर्श विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारे परीक्षा पॅड बक्षीस म्हणून देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळाला.
६० विद्यार्थ्यांना उपयुक्त वस्तूंचे वाटप
वाढदिवसाचे औचित्य साधून सौ. अलका चोरघे यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत ६० गरजू विद्यार्थ्यांना रोजच्या भोजनासाठी लागणारी भोजनाची ताटे, वही-पेन यांसारख्या आवश्यक शालेय वस्तू आणि पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. हे साहित्य हाती पडताच मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हेच सौ. अलका चोरघे यांच्या वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट ठरले, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
पर्यावरणाचा संदेश देत संस्थेच्या परंपरेनुसार शाळा परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश विद्यार्थ्यांनी या वेळी घेतला.
मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती
या संपूर्ण कार्यक्रमाला निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भक्कम साथ लाभली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापू परब,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय विलास वर्तक, महाराष्ट्र राज्य सचिव शुभांगी राऊत,सहसचिव विद्या सावंत,महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य भाग्यश्री परब,मनीषा गुरव, उषा सुतार, स्मिता पाटील, कल्पना चुरी, दत्तात्रय पालव, प्रतीक्षा गुरव, अंजली गावकर, मीना ठाकोर, स्मिता कांडार आणि नंदिनी हामंद. तसेच वसई तालुका सचिव रूपाली मोलावडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.
विश्व प्रार्थनेने सांगता
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले. त्यानंतर संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणारी ‘विश्व प्रार्थना’ एकत्र मानून कार्यक्रमाची शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात सांगता झाली. दरम्यान निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेने अलका चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक पुढाकार सर्वांसमोर एक आदर्श नक्कीच ठरला आहे.








