मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत धोरण आणण्याचे ठरवलं जात होतं. मात्र या बदल्या करताना प्रत्येक अभियंत्याला किमान तीन ते पाच प्राधान्यक्रम देण्याची सुविधा असावी, तसेच एकाच पदावर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या बदल्यांना प्राधान्य द्यावे अशा सूचना अभियंत्यांच्या संघटनेने केल्या होत्या.मात्र मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन धोरण आणण्याची चर्चा सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.
अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन धोरण सुरू असतानाच धक्कादायक माहिती
महापालिकेतील विविध महत्त्वाच्या विभागांमधील अभियंत्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीसाठी राजकीय नेत्यांच्या शिफारस पत्रांचा मोठा मारा सुरू असल्याचे माहिती अधिकारातून म्हणजे RTI मधून उघड झाले आहे. मुंबई महापालिकेत पदोन्नती व बदल्यांसाठी अभियंत्यांकडून शिफारशी केल्या जात असल्याचं समोर आलं आहे. जलअभियंता विभाग, स्थापत्य विभाग, पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग आदी विभागांतील अभियंत्यांनी बदल्यांसाठी नेत्यांमार्फत शिफारशी केल्या जात असल्याचं समोर आलं आहे .काही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्रे दिली असून, त्यांची प्रत मुंबई महापालिकेकडे पाठविल्याचे समोर आले आहे.
मंत्री, आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून शिफारशी
प्रत्यक्षात राज्य सरकारमधील मंत्री, आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून महापालिकेतील अभियंत्यांच्या पदोन्नती, पदस्थापना आणि बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात शिफारशी होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
२०२४, २०२५ आणि २०२६ या काळात अशा अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. शिफारसपत्रे देणाऱ्यांमध्ये अंधेरी विधानसभा आमदार अमित साटम,भाजपा मुंबई अध्यक्ष मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांची नावे असल्याचं समोर आलं आहे.तर, विरोधी पक्षातील अंबादास दानवे, महेश सावंत आदींचाही यात समावेश असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनीही शिफारसपत्रे दिल्याचे समोर आले आहे.एवढंच नाही तर मुंबईबाहेरील आमदार, खासदारांनीही मुंबई महापालिकेतील अभियंत्यांसाठी शिफारसपत्रे दिली असल्याचं समोर आलं आहे.
आरटीआय कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अनेक अभियंत्यांनी एकाच पदावर ६-७ वर्षे काम केल्यामुळे, तर काहींनी कौटुंबिक कारणांमुळे दुसऱ्या विभागात जाण्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींनी सनदी अधिकारी किंवा महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी अशा प्रकारे शिफारशी करू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने अधिकृत अधिसूचना काढावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये १२२ सहाय्यक व दुय्यम अभियंत्यांच्या बदल्यांवरून वाद निर्माण झाला होता, ज्याची दखल घेत प्रशासकीय कारवाईही करण्यात आली होती. मात्र, आता समोर आलेल्या या माहितीमुळे महापालिकेतील बदल्यांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोणी कोणी शिफारसरपत्रे दिली आहेत?
अंधेरी विधानसभा आमदार अमित साटम, राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), अण्णा दादू बनसोडे (विधानसभा उपाध्यक्ष), अमित साटम (मुंबई भाजप अध्यक्ष), गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री), माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट (सामाजिक न्याय मंत्री), चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री), पंकजा मुंडे (पर्यावरण मंत्री), शिवेंद्रराजे भोसले (सार्व. बांधकाम मंत्री), उदय सामंत (उद्योगमंत्री), राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री), भरत गोगावले (रोहयो मंत्री), प्रकाश आबिटकर, (आरोग्य मंत्री), कालिदास कोळंबकर (आमदार), प्रसाद लाड (आमदार), रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री), मंगलप्रभात लोढा (मंत्री), प्रवीण दरेकर (आमदार), गोपिचंद पडळकर (आमदार), तुकाराम काते (आमदार), दिलीप लांडे (आमदार), नरहरी झिरवळ (मंत्री), प्रकाश सुर्वे (आमदार), महेश सावंत (आमदार), अंबादास दानवे (आमदार), सुनील प्रभू (आमदार), श्रीकांत शिंदे (खासदार), गणेश नाईक (मंत्री), राहुल शेवाळे (माजी खासदार)








