डोंबिवलीतील वाहतुकीबद्दल नेहमीच नागरिकांच्या तक्रारी राहिल्या आहेत. वाहतूककोंडीची समस्या तर नित्याचीच झाली आहे. सोबतच भरधाव वेगात चालणारी रिक्षा असो, कार असो किंवा बाईक. रस्त्यावर वेग मात्र सारखाच असतो. यामुळे एक भयानक अपघात घडला.पेंढारकर कॉलेज परिसरात बुधवारी एका भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना तळली
भरधाव कारचा थरार
डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात बुधवारी एका भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली.या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना तळली आहे. मात्र दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला.
सर्रास विरुद्ध दिशेने वाहन चालवतात
डोंबिवली-कल्याण शिळ मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.या वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवतात.अशाच प्रकारातून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत संतापले
या मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीसह ‘राँग साईड’ने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी म्हटलंय की, “दररोज वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक नागरिक आणि विद्यार्थी त्रास सहन करतात त्यामध्ये काही मुजोर वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहना घेऊन प्रवास करतात.त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. आज जी घटना घडली यामध्ये वाहनांच्या नुकसान तर झालच आहे.परंतु,पोलिसांचा वचक न राहिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. वाहतूक कोंडी कशी कमी होणार, याकडे पोलीस प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली पाहिजे. कठोर कारवाई केली पाहिजे”.असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या अपघातानंतर तरी वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या वेगमर्यादेबद्दल आणि विरुद्ध दिशेनं वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.








