एकीकडे देश डिजिटल आणि हायटेक होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील एका गर्भवती महिलेला 2 किमी खाटेवरून रुग्णालयात न्यावे लागणे हे नक्कीच लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. भाटू तांड्यासारख्या अनेक दुर्गम भागात तात्काळ पक्क्या रस्ते बांधण्यात यावे यासाठी कित्येक वर्षांपासून नागरिकांची मागणी आहे.मात्र अद्यापही याबबात कोणतीही दखल घेतली गेली नाही.
गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ
महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात मूळ भूत सुविधांची दाणादाण उडालेली पाहायला मिळते. रस्ता, पाणी आणि आरोग्य या मूलभूत गरजांसाठी ग्रामीण भागातील जनतेला दररोज संघर्ष करावा लागतो. पक्क्या रस्त्यांअभावी आणि दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे दुर्गम व आदिवासी भागातील गर्भवती महिलांना खाट, स्ट्रेचर किंवा झोळीवरून मैलोनन्मैल प्रवास करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागल्याच्या घटना वारંवार समोर येत आहेत. प्रशासकीय आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत
अशीच एक घटना घडली नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील भाटू तांडा येथे. पक्का रस्ता नसल्यामुळे आणि पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने एका प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेला चक्क खाटेवरून २ किलोमीटरचा चिखलमय रस्ता तुडवत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले.
नेमकी घटना काय?
भाटू तांडा येथील रहिवासी अनिल राठोड यांची कन्या ‘वर्षा’ या आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या. गुरुवारी अचानक त्यांना तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाटू तांड्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता.
रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने गावात कोणतीही चारचाकी गाडी किंवा ॲम्बुलन्स पोहोचणे अशक्य झाले. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यास आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता.
लाकडी खाटावरून नेलं रुग्णालयात
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक मदतीला धावून आले. त्यांनी घरात असलेली लाकडी खाट बाहेर काढली आणि त्यावर वर्षा यांना झोपवून २ किलोमीटरचा चिखलाचा टप्पा पार करण्यास सुरुवात केली. मुसळधार पाऊस आणि निसरड्या रस्त्यावरून वाट काढत, पायी चालत ग्रामस्थांनी तिला मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवलं आहे.
मुख्य रस्त्यावर आल्यानंतर तेथून खाजगी वाहनाने त्यांना तत्काळ मुखेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वेळेत रुग्णालय गाठल्यामुळे मोठी दुर्घटना टळली
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. वेळेत रुग्णालय गाठल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वर्षा यांनी रुग्णालयात एका कन्येला जन्म दिला. सध्या बाळ आणि आई दोघींचीही प्रकृती उत्तम आणि सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या आनंदाच्या बातमीने राठोड कुटुंब आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या घटनेमध्ये बाळ आणि आई दोघींचीही प्रकृती उत्तम आणि सुखरूप असली तरी प्रशासनाच्या या उदासीनतेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा कधी संपणार? भाटू तांड्यात आजपर्यंत पक्का रस्ता का बनू शकला नाही? पावसाळ्यात ही गावे मुख्य प्रवाहापासून तुटतात, मग प्रशासन याची गंभीर दखल कधी घेतली जाणार आहेत. असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.








