आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे लहान मुलां तर याचं योग्य ज्ञान असणं फार महत्त्वाचं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुले व विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे मिळावेत आणि ते जबाबदार नागरिक बनावेत, या उद्देशाने ‘क्विक हील फाउंडेशन’ आणि गोरेगाव पश्चिम येथील ‘पटकर-वर्दै महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सायबर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
गोरेगाव पश्चिम येथील रवींद्र भारती शाळेत ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या प्रमुख उपक्रमाअंतर्गत हे सत्र पार पडलं. रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दै महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सायबर जनजागृतीचे धडे देण्यात आले.
‘स्टुडंट सायबर वॉरियर्स’कडून मार्गदर्शन
पटकर-वर्दै महाविद्यालयाच्या प्रशिक्षित ‘स्टुडंट सायबर वॉरियर्स’ उपासना विजय माळी आणि समीक्षा नारायण उंबाळकर यांनी या सत्राचे नेतृत्व केलं. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत काही महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केलं. जसं की,
डेटा संरक्षण आणि गोपनीयता: ऑनलाइन जगात आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी.
ऑनलाइन फसवणूक ओळखणे: फिचिंग ,फेक ऑफर्स आणि सायबर फ्रॉडपासून कसे सावध राहावे.
सोशल मीडियाचा सुरक्षित वापर: अनोळखी लोकांशी संवाद साधताना कशी काळजी घ्यायची हे समजावून सांगितलं.
सायबर गुन्ह्यांची तक्रार: सायबर बुलिंग किंवा फसवणूक झाल्यास योग्य ठिकाणी तक्रार कशी करावी याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सत्रादरम्यान प्रत्यक्ष जीवनातील विविध उदाहरणे आणि संवादात्मक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर विश्वातील धोक्यांची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला , प्रश्न विचारले आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
शाळा व्यवस्थापनाकडून उपक्रमाचे कौतुक
रवींद्र भारती शाळेच्या व्यवस्थापनाने या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल क्विक हील फाउंडेशन आणि पटकर-वर्दै महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे महत्त्व समजण्यास मदत होते आणि ते इंटरनेटचा वापर अधिक जबाबदारीने करू शकतात, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला.








