“शिक्षणासाठी वयाची अट नसते… फक्त जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असावी लागते!”
ही ओळ जळकोट तालुक्यातील विराळ गावच्या संघशीला पांडुरंग वाघमारे यांनी अक्षरशः खरी करून दाखवली आहे.
सन 2004-05 मध्ये त्यांनी बारावीची परीक्षा दिली होती, मात्र काही विषय राहिल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. त्यानंतर लग्न झाले, संसाराची जबाबदारी वाढली आणि शिक्षण मागे पडले. पण मनातली शिकण्याची ओढ मात्र कधीच संपली नाही. पुणे शहरात स्थलांतर केल्यानंतर त्यांनी मोलमजुरी करत कुटुंबाचा गाडा ओढला. आज त्या ‘आशा’ स्वयंसेविका म्हणून समाजसेवा करत आहेत, पण त्याचबरोबर एक अपूर्ण स्वप्न त्यांना सतत खुणावत होतं — शिक्षण पूर्ण करण्याचं.
संघशीला ताईंना GNM नर्सिंगचं शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासाठी बारावी उत्तीर्ण होणं आवश्यक होतं. काम, घर आणि जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि यंदा बारावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा राज जयवर्धन कांबळे हाही यंदाच बारावीचा विद्यार्थी होता.
निकालाचा दिवस उजाडला आणि आनंदाचा क्षण अविस्मरणीय ठरला. संघशीला वाघमारे यांनी जिद्दीच्या जोरावर बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली, तर त्यांच्या मुलानेही ५५.६७ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. आई आणि मुलगा — दोघांनी एकाच वेळी बारावीची पायरी पार केल्याने हा क्षण अधिकच खास बनला.
या आनंदात आणखी एक विशेष योगायोग म्हणजे आजच संघशीला ताईंचा लग्नाचा १८ वा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवशीच आयुष्यातील ही मोठी यशाची भेट मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे आणि सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संघशीला वाघमारे यांचा हा प्रवास त्या प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे, ज्या परिस्थितीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात. जिद्द असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर कोणतीही अडचण तुम्हाला यशापासून दूर ठेवू शकत नाही.
आई आणि मुलाच्या या दुहेरी यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, संघशीला ताई आज अनेकांसाठी प्रेरणेचा दीप बनल्या आहेत.








