Watermelon death case:पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाचा झालेला दुर्दैवी मृत्यू सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्लेल्या या कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलींना अवघ्या काही तासांतच उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान या चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात कलिंगड खाण्याबाबत मोठी भीती पसरली होती. मात्र, आता या प्रकरणातील FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, याने प्रकरणाला एक वेगळे वळण दिले आहे.
घटनेनंतर तत्काळ एफडीएने मृतांच्या घरातून कलिंगडाचे तुकडे, रात्री जेवणात असलेली बिर्याणी आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारचा कृत्रिम गोडवा किंवा घातक रंग मिसळण्यात आलेले नव्हते. इतकेच नाही, तर घरातील इतर अन्नपदार्थही मानकानुसार सुरक्षित असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. म्हणजेच, प्राथमिक स्तरावर अन्नात किंवा फळात कोणतीही भेसळ आढळलेली नाही.
मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर अन्नात भेसळ नव्हती, तर एका सुदृढ कुटुंबाचा अशा प्रकारे अंत कसा झाला?
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, हा मृत्यू अन्नातील एखाद्या विशिष्ट ‘बॅक्टेरिया’मुळे किंवा इतर कोणत्याही अज्ञात विषारी घटकामुळे असू शकतो, जो प्राथमिक तपासणीत दिसून आला नसावा. कलिंगडात भेसळ नसल्याचे जरी सिद्ध झाले असले, तरी मृत्यूचे हे गूढ अद्याप कायम आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचे सत्य कलिना येथील फॉरेन्सिक लॅबच्या ‘व्हिसेरा’ अहवालानंतरच समोर येणार आहे.
तूर्तास, सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ताजे अन्न आणि फळे खाण्याबाबत खबरदारी नक्की घ्या.
ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र









