तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सहाव्या दिवशी अभिनेता विजय यांच्या टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षासाठी सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.
तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर व्हीसीके अर्थात विदुथलाई चिरुथैगल काची पक्षाने अखेर विजय यांच्या टीव्हीकेला अधिकृत पाठिंबा दिला आहे. व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी टीव्हीके नेते अधव अर्जुन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. या भेटीचा फोटोही आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हीसीकेच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यापूर्वी टीव्हीकेकडे 116 आमदारांचा पाठिंबा होता. आता हा आकडा वाढून 119 वर पोहोचला असून, 234 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा एकने अधिक झाला आहे.
दरम्यान, तामिळनाडूतील सत्तासमीकरणांमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या पाच आमदारांना हैदराबादला हलवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेलूरचे आमदार पी. विश्वनाथन हे या आमदार गटाचे नेतृत्व करत आहेत. तसेच, विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यास पी. विश्वनाथन यांना मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीत टीव्हीकेने 108 जागांवर विजय मिळवला. याशिवाय काँग्रेसचे 5, सीपीआयचे 2 आणि सीपीआय(एम)चे 2 आमदार आधीच विजय यांच्या बाजूने उभे राहिले होते. आता व्हीसीकेच्या पाठिंब्यानंतर विजय यांच्या सरकार स्थापनेचा दावा आणखी मजबूत झाला आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता ते मुख्यमंत्री असा विजय यांचा प्रवास आता प्रत्यक्षात उतरणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.








