मुंबई ते नाशिक महामार्गाची पावसाने अक्षरश: चाळण झाली असून या महामार्गावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे.याचचं एक जिवंत उदाहरण म्हणजे नुकताच शहापूरच्या भारंगी नदी पुलावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत यहा खड्डा बुजवला होता. मात्र,बाकीच्या खड्ड्यांच काय असा प्रश्न निर्माण होत आहे. असे एकेक खड्डे बुजवण्याऐवजी मुंबई ते नाशिक महामार्गाची झालेली चाळण बुजवून प्रवाशांचे प्राण वाचवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी
हे तेच विकास गोरे आहेत ज्या जवानाने पूरग्रस्त भागात बचावकार्यात स्वतःला झोकून देऊन अनेकांचे जीव वाचवले, नुकतंच भिवंडीत जी धोकादायक इमारत कोसळली त्या अपघातात इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवलं. पण ठाणे पालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलातील जवान विकास लहू गोरे यांचा खड्ड्याने बळी घेतला.
खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक आदळून….
शहापूरच्या भारंगी नदी पुलावरील खड्ड्यात अपघात होऊन विकास गोरे यांचा मृत्यू झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी पहाटे कळंभे हद्दीत भारंगी नदीच्या पुलाजवळ मोठ्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक आदळून त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. ते रस्त्यावर फेकले जाऊन डिव्हायडरवर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.स्थानिकांनी तत्काळ त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही.
गोरे हे ठाण्याला जाण्यासाठी पहाटे ४:३० वाजता आसनगावहून सुटणारी पहिली लोकल पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे बुलेटवरून निघाले होते.असे शहापूरचे पोलिस निरीक्षक विलास कदम यांनी सांगितले.
संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
विकास गोरे यांचा अवघ्या दोन वर्षांपूर्वी विकास विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन जुळ्या चिमुकल्या मुली आहेत. त्यांच्या निधनाने गोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खड्ड्यांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यांना जबाबदार संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईक व नागरिकांनी केली आहे.दरम्यान त्यांच्यावर बामणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोरे यांच्या पत्नीला पालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी
ठाणे महापालिकेने सर्व जवानांचा २५ लाखांचा विमा काढलेला आहे. त्यानुसार विकास गोरे यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमानुसार त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर पालिकेत नोकरी दिली जाईल त्यांच्या वारसाला इतर अनुज्ञेय लाभ मिळतील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विकास गोरे यांचा जीव घेणारा खड्डा बुजवला पण बाकीच्या खड्ड्यांचे काय?
विकास गोरे यांचा जीव घेणारा खड्डा अपघातानंतर काही तासांतच सोमवारी बुजविण्यात आला. अपघातापूर्वीच हा खड्डा दुरुस्त केला असता, तर आज विकास आपल्या कुटुंबासोबत असते, अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाइकांनी दिली.
तसेच वाहनचालक आणि स्थानिक संघटनांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “टोल नाक्यावर पैसे न दिल्यास वाहन सोडले जात नाही, मग महामार्गावरील हे धोकादायक खड्डे प्रशासनाला दिसत नाहीत का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एकेक खड्डा बुजवून हा प्रश्न सुटणारा नाही. संपूर्ण मुंबई-नाशिक महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.








