जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या जबरदस्त प्रत्युत्तराची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. भारतीय सैन्यदलांनी ७ मे ते १० मे या कालावधीत राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज एक वर्ष पूर्ण झाले असून, या निमित्ताने तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे.
लेफ्टिनेंट जनरल राजीव घई, एअर मार्शल अवधेश भारती आणि व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानला कशाप्रकारे मोठा धक्का दिला, याची माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण लष्करी मोहीम होती. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला भारताने थेट आणि कठोर संदेश दिला. अवघ्या साडेतीन दिवसांच्या या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे आणि अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले.
या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानची तब्बल १३ विमाने पाडली, ११ लष्करी तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला, अशी माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांच्या मते, ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे आणि दहशतवादाविरोधातील ठाम भूमिकेचे प्रतीक होते. देशाच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश भारताने जगाला दिला.
दरम्यान, या कारवाईच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरातून भारतीय सैन्यदलांप्रती अभिमान व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावरही ऑपरेशन सिंदूरची जोरदार चर्चा सुरू आहे.










